राजगड (Rajgad)

पुण्यात किल्लाची सफर करताना राजगड किल्ला विसरून कसं चालेल. राजगड हा शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला एक भव्य दिव्य किल्ला आहे. या किल्लावर तीन माच्या आणि एक बालेकिल्ला आहे. राजगड निसर्गसौंदर्याने नटलेला एक किल्ला असून या किल्लावर शिवाजी महाराजांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा तुम्हाला दिसू शकतात.

रायगड (Raigad)

रायगड किल्याची महाराष्ट्राच्या इतिहासात एक विशिष्ठ ओळख आहे. रायगड किल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख होती. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकदेखील याच गडावर झाला होता. पूर्वी या किल्ल्याचे रायरी नाव होते मात्र नंतर स्वराज्याची राजधानी झाल्यावर या किल्ल्याला रायगड हे नाव देण्यात आले. पुणे शहरात फिरताना रायगड किल्ला पाहण्यास मुळीच विसरू नका. गडावर रोप वेने जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय गडावर राहण्याची आणि जेवणाची सोयदेखील आहे.

शिवनेरी किल्ला (Shivneri)

पुण्यातील जुन्नर गावात शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने या किल्ल्याला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गडावर आजही शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काही खुणा तुम्हाला दिसू शकतात. ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि शिवाजी महाराजांविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी या स्थळाला अवश्य भेट द्यावी.

पुरंदर (Purandar Fort)

पुण्याजवळ असलेल्या पुरंदर किल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कात्रज घाट अथवा दिवे घाट ओलांडून तुम्ही पुरंदरवर जावू शकता. पुरंदराच्या चौफेर माच्या आहेत. पुरंदरसोबतच तुम्ही वज्रगडदेखील पाहू शकता. गडावर पाहण्यासाठी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत.

लोहगड (Lohagad Fort)

पुणे शहराजवळ असलेला लोहगड हा किल्ला स्वराज्यातील एक बळकट किल्ला होता. गडावर जाण्यासाठी चार प्रमुख प्रवेशद्वार आणि निमुळता रस्ता आहे. प्रवेशद्वारांना गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा अशी नावे आहेत. लोहगडावर शंभर लोक एकत्र राहू शकतील अशी गुहा आहे. स्वराज्याच्या ऐतिहासिक खुणा पाहण्यासाठी या गडाला जरूर भेट द्या.

देहू (Dehu)

पुण्यात फिरताना आळंदीसोबत देहूलादेखील जरूर जा. आळंदी आणि देहू ही भक्तीरसात भिजलेली गावं आहेत. ज्यांना संतांच्या चरित्रात रस आहे अशा लोकांनी या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी. तुम्हा या दोन्ही गावांमध्ये अप्रतिम भक्तीचा अनुभव येऊ शकतो. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. देहूमध्ये भंडारा डोंगर आणि गाथा मंदिर पाहण्यासारखी स्थळं आहेत.

आळंदी (Alandi)

पुण्यापासून जवळ असलेल्या आळंदी गावादेखील तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. देवाची आळंदी या नावाने आळंदी गावाची ख्याती आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी गावात समाधी घेतली होती. आळंदी इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं एक गाव आहे.

मोराची चिंचोळी (Chincholi)

पुणे – अहमदनगर रोडवर शिरूर जवळ मोराची चिंचोळी हे एक छान पर्यटन स्थळ आहे. या गावात मोरांचे वास्तव्य असल्याने याला मोराची चिंचोळी असं नाव पडलं आहे. मोकळ्या वातावरणात फिरणारे मोर पाहण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात. पावसाळ्यात मोरांचे नृत्य पाहण्याची एक वेगळाच आनंद तुम्हाला या गावात नक्कीच मिळू शकतो. शिवाय या गावांमध्ये पर्यटकांसाठी होम स्टेची व्यवस्थादेखील करण्यात येते.

ॲम्बी व्हॅली

पुणे शहराजवळ वसलेलं ॲम्बी व्हॅली हे देखील एक निसर्गरम्य छोटेखानी शहर आहे. लोणावळ्यातून तुम्ही ॲम्बी व्हॅलीला जावू शकता. अकरा हजार एकरमध्ये हे शहर वसलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही दोन ते तीन दिवस निवांतपणे राहण्यासाठी नक्कीच जाऊ शकता.

लवासा सिटी (Lavasa City)

लवासा सिटी हे पुण्यातील एक नियोजित, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून काहीश्या अंतरावर असलेल्या लवासा सिटीची ख्याती जगभरात पसरलेली आहे. प्रशस्त हॉटेल्स आणि अत्याधुनिक सुविधांनी नटलेलं हे एक छोटंसं शहर आहे. थोडंस खर्चिक असलं तरी लवासामध्ये राहण्याचा अनुभव नक्कीच रोमांचक असू शकतो.